सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहराच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाच्या कामावरून नव्याने वादंग निर्माण झाला आहे. करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे असून त्यात ऐतिहासिकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे काम ना शिवभक्तांना पटले, ना सर्वसामान्य जनतेला योग्य वाटले, असे स्पष्ट मत महामंडळाने व्यक्त केले.
मध्यवर्ती महामंडळाने पत्रकार परिषदेत जाहीर केले की, जनभावनेचा आदर राखत मध्यवर्ती महामंडळ जनतेसोबत ठामपणे उभे आहे. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानंतर या विषयावर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. तसेच शहरातील शिवभक्त, नागरिक आणि विविध संघटनांची संयुक्त बैठक घेऊन महापालिका प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी संबंधित स्थळाचे सुशोभीकरण करताना ऐतिहासिक संदर्भ, वास्तुरचना आणि दर्जा यांचा विचार होणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात झालेले काम दर्जाहीन असून त्यात कोणतीही ऐतिहासिक झलक दिसत नाही,” अशी टीका पदाधिकाऱ्यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत सदरचे काम पुन्हा करून ते ऐतिहासिक दर्जाचे करावे, अशी ठाम मागणी मध्यवर्तीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी राजन जाधव यांनी स्पष्ट केले केले.
दरम्यान, या कामासाठी झालेल्या खर्चावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत पारदर्शक चौकशीची मागणीही पुढे येत आहे. शिवजयंतीनंतर या मुद्द्यावर शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीव्र लढा उभारणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातील कामाच्या संदर्भात शिवप्रेमीमध्ये शिव तीव्र संतापाची लाट आहे. शिवजयंती उत्सवाला आणि पाळण्या सोहळ्याला बाधा येऊ नये मध्यवर्ती महामंडळ शांत होते. शिवजयंतीनंतर या संदर्भात ऐतिहासिक वारसा असलेले पुतळा परिसर करण्यासाठी तीव्र लढा उभा करू
श्रीकांत डांगे _ सदस्य मध्यवर्ती महामंडळ

पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता केलेले काम
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणा साठी आलेला निधी लॅप्स होण्याची भीती घालून घिसाट घाईने सदरचे काम केले आहे. मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. याला कोणताही ऐतिहासिक वारसा नसल्याने हे काम शिवप्रेमींना पसंत नाही. त्यामुळे पुन्हा ऐतिहासिक वारसा असलेले सुशोभीकरण करण्याची मागणी घेऊन मध्यवर्ती महामंडळ महापालिका प्रशासनाकडे पाठपुराव करणार आहे .
राजन जाधव, सदस्य मध्यवर्ती महामंडळ
