साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त पूर्वसंध्येस अभिवादन सभा संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ आणि क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या पुण्यतिथी दिनाच्या पूर्वसंध्येस अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लांबतुरे, मध्यवर्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष खंडू बनसोडे, सुनील रसाळ, लखन गायकवाड, किशोर जाधव, अनिल बनसोडे, विशाल लोंढे, साक्षांत लोखंडे, बापूसाहेब गायकवाड, विश्वेश्वर गायकवाड, विकास जरीपटके, महेश तेजबिंदे, महेश जोगदंड, विशाल डोलारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मेणबत्या लावून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुरेश पाटोळे यांनी, महाराष्ट्र शासनाने आर्टी ची स्थापना केली याबद्दल आभार व्यक्त केले. अण्णाभाऊंना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे आणि अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे या दोन मागण्या देखील शासनाने पुढील काळात सोडवल्या पाहिजेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मध्यवर्ती समितीचे संस्थापक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी,’अण्णा भाऊ हे युग प्रवर्तक, परिवर्तनवादी, क्रांतिकारक विचारवंत आणि लेखक होते. म्हणून त्यांचे विचार तळागाळात पोहोचवले पाहिजेत.’ या शब्दात आपले मत व्यक्त केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.