पुरंदावडेत रंगला नवचैतन्य भक्तीचा आनंद, सोहळा माळशिरस मुक्कामी

सोलापूर : प्रतिनिधी (माळशिरस)
या सुखा कारणे देव वेडावला |
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ॥
या संत वचनाप्रमाणे संतांच्या समवेत शाश्वत सुखाचा आनंद देणारा स्वर्गालाही लाजवेल असा गोल रिंगणाचा अनुपम्य सोहळा पुरंदावडे येथील शेती महामंडळाच्या मैदानात मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडला. आज लाखो वैष्णवांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवित नवचैतन्य भक्तीचा आनंद सोहळा साजरा केला. सायंकाळी ढगाळ वातावरणात हा सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला. उद्या शनिवार दि.१३ रोजी तो वेळापूरकडे मार्गस्थ होईल.
नातेपुते येथे पहाटे सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते माऊलींची नैमित्तीक पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता माऊलींसह लाखो वैष्णवभक्तांनी नातेपुते नगरीचा निरोप घेतला. सुमारे पाच लाखांच्या पायदळासह भागवत धर्माची पताका फडकावित श्री ज्ञानराज माऊलींच्या पालखी सोहळ्याने पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पुरंदावडेकडे कूच केली. दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी हा सोहळा सकाळी साडे नउ वाजता मांडवे ओढा येथे पोहोचला. सरपंच शितल अर्जुन दुधाळ, उपसरपंच मालन खोमणे, ग्रामसेवक पवार, माजी जि प सदस्य गायकवाड आदीनी अश्वांचे व सोहळ्याचे स्वागत करुन माउलींचे दर्शन केले. मांडवे ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळावर विसाव्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. येथे माऊलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्यांनी भोजन घेतले.
आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे वारकर्यांमध्ये आज चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. पुरंदावडेच्या रिंगण सोहळ्याची सर्वांना ओढ लागून राहिली होती. मांडवे ओढा येथे पालखी खांद्यावर घेण्यात आली. ती ओढ्याच्या दुसर्या काठावर आणण्यात आली. त्यानंतर पालखी रथात ठेवून दुपारी १२:३० वाजता सोहळा पुढे मार्गस्थ झाला. पालखी महामार्ग झाल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. आज पालखी सोहळ्याला नातेपुते ते माळशिरस या वाटचालीत कोठेच अडचण आली नाही.
सदाशिवनगर येथे स्वागत
सदाशिवनगर येथे पालखी सोहळा पोहोचल्यावर श्री शंकर सहकारी साखर कारखाना व सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने माउलीसह वैष्णवांचे स्वागत करण्यात आले. सदाशिवनगर येथील भाविकांच्या वतीने स्वागत स्विकारून रिंगण सोहळ्यासाठी माऊलींचे अश्व पुरंदावडे हद्दीत २:३० वाजता पोहोचले तर पालखी ३:२० वाजता रिंगणात पोहोचली. त्यावेळी माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी माउलींचे दर्शन घेवुन सोहळ्याचे स्वागत केले. भाविकांनी यावेळी दर्शनासाठी एकच गर्दी केली.
आखीव रेखीव रिंगण
पुरंदावडे येथील शेती महामंडळाच्या विस्तीर्ण प्रांगणात गोल रिंगणासाठी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने मैदान तयार करुन घेतले होते. रिंगणाचा तळ सुसज्ज केला होता. भोसरीच्या श्री स्वामी समर्थ आर्टिस्ट राजश्री जुन्नरकर भागवत यांनी रिंगणाच्या मध्यभागी व गोलाकार नेत्रदिपक रांगोळी काढली होती तर अश्वांच्या रिंगणाच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. सुरूवातीला रथापुढील १ ते २७ दिंड्या अश्वासह रिंगणात आल्या. त्यापाठोपाठ माऊलींची पालखी खांद्यावर घेवून रिंगणात आणण्यात आली. रथापाठीमागील सुमारे २० दिंड्या रिंगण सोहळ्या साठी आत आणण्यात आल्या. चोपदारांनी पताकाधारी वारकर्यांना रिंगणाच्या मध्यभागी घेतले. त्यानंतर रिंगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींची पालखी रिंगणाच्या मधोमध उभारण्यात आलेल्या शामियानात आणण्यात आली.
नेत्रदिपक रिंगण सोहळा
पुरंदावडे येथील हा नेत्रदिपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. अश्वांची पूजा झाल्यानंतर जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला ३ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर स्वाराचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ माऊलींचा अश्व धावला आणि लाखो भाविकांनी माऊली.. माऊली.. नामाचा एकच जयघोष सुरू केला आणि या जयजयकारातच दोन्ही अश्वांची नेत्रदिपक दौड सुरु झाली. पहिली प्रदक्षणा पुर्ण होत असतानाचा स्वाराच्या अश्वाचा मागचा उजवा पाय माउलीच्या अश्वाच्या लगाम मध्ये अडकल्याने तो अडखळला त्यावेळी स्वाराचा अश्व व अश्वावर स्वार असलेला तुकाराम कोळी हे भाविकांच्या अंगावर पडले. यात दोघेजण जखमी झाले त्यात एकाच्या तोंडाला मार लागला. त्याच्या तोंडातुन रक्त आले त्यास एन एस एस च्या विद्यार्थ्यानी रुग्णवाहिकेत घालून रुग्णालयात पोहोचविले. त्यानंतर रिंगण पुर्ण करण्यात आले.
उडीचा नेत्रदिपक सोहळा
रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यात गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्यां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. उडीच्या कार्यक्रमा साठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. सर्व वारकरी श्वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते. एकात्म भक्तीभावाचा हा शाश्वत सुखाचा सोहळा लाखो भाविकांनी अनुभवला.