सोलापूर

अस्सल सोलापुरी सुधा उपाहारगृहाचा मोदी मध्ये रविवारी शुभारंभ

रविवार 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते उदघाटन

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहारगृहाच्या नवीन शाखेचा मोदी रेल्वेलाईन परिसरात रविवार दि. 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. उदघाटनानंतर सायंकाळी 6 ते 9 मित्र परिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्‍वनाथ किणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूरमध्ये नाष्टा करावा तर सुधा ईडली मध्येच अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात मिळवलेल्या किणगी परिवाराचे प्रमुख शंकरराव चन्नवीरप्पा किणगी यांनी सन 1960 मध्ये कस्तुरबा मंडई परिसरात निर्मल भवन मध्ये चहा आणि शंकरपाळी मिळण्याचे कॅन्टीन सुरू केले. तर व्यवसायाचा विस्तार आणि ग्राहकांना चांगला आणि चवदार नाष्टा मिळावा म्हणून 1965 मध्ये मंगळवार पेठेतील एका वाड्यात चार खुर्च्या टेबल मांडून सुधा ईडलीगृह सुरू केले आणि पाहता पाहता सोलापूरकरांच्या सोबतच आजुबाजुच्या शहरातही सुधा ईडलीगृहाच्या ईडली सांबर चटणी आणि मस्का ब्रेडची चव ग्राहकांच्या पसंतीला पडली. ईडली वड्यासोबत मनसोक्त चटणी आणि सांबर मिळण्याचे सुधा ईडलीगृह हे सोलापूर मधील एकमेव ठिकाण ठरले आहे. नंतर कस्तुरबा मंडई परिसरात कॅन्टीन सुरू केलेल्या परिसरातच नाष्टा आणि नमकीनसाठी 1988 मध्ये सुधा रेस्टॉरंट सुरू केले.

शंकरराव किणगी यांच्या नंतर हा व्यवसाय त्यांचे मुलांनी पुढे सुरू ठेवला आणि विश्‍वनाथ शंकरराव किणगी यांनी सन 2001 मध्ये अब्दुलपूरकर मंगलकार्यालयाच्या जवळ नव्याने सुधा उपाहारगृहाची शाखा सुरू केली. यामधून नाष्टा आणि जेवणासाठी महाराष्ट्रीयन थाळीही ग्राहकांना सुरू केली. शहर वाढले ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून जुळे सोलापूर परिसरात 2017 मध्ये सुधा उपहारगृहाची आणखी एक शाखा सुरू करण्यात आली. बदलत्या काळा नुसार ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचे मनात आणून शंकरराव किणगी आणि सिध्देश्‍वर शंकरराव किणगी यांनी मंगळवार पेठेतील जुन्या सुधा ईडलीगृहाचे सन 2000 मध्ये नुतणीकरण करून अद्ययावत आणि वातानुकुलीत असे सुधा ईडलीगृह ग्राहकांच्या सेवेत आणले. तसेच अब्दुलपूरकर मंगल कार्यालया शेजारील सुधा उपाहारगृहात ग्राहकांना जागेची अडचण होवू लागल्याने किणगी परिवाराने ग्राहकांच्या सोईसाठी सुधा उपाहारगृह हे सात रस्ता ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील यतिराज हॉटेलच्या शेजारी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकुलीत इमारतीमध्ये आणले. या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आली. ग्राहकांसाठी आर ओ वॉटरची सुविधा देण्यात आली आहे. तसेच सर्व खाद्य पदार्थ वॉटर सॉफ्टनरच्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहेत. या नव्या आणि आधुनिक पध्दतीने तयार करण्यात आलेले सुधा उपाहारगृह ग्राहकांच्या सेवेत दि. 15 मे पासून रूजु होणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 3.30 वाजेपर्यत नाष्टा तसेच दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे. गेली 60 वर्षे किणगी परिवाराने सुधा उपाहार गृहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सर्वच हॉटेल मध्ये ईडली चटणी आणि सांबरची एकच चव कायम ठेवून ग्राहकांची पसंती मिळवली आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला बसवराज शंकरराव किणगी, सिध्देश्‍वर शंकरराव किणगी, अशोक विश्‍वनाथ किणगी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!