तुला आमदारकीला दाखवतो, कसा निवडून येतो, ते बघतो.? अशा शब्दांत मनोज जरांगेंनी चंद्रकांत दादांना दिले आवाहन
मराठा एक झालाय म्हणूनच मोदी महाराष्ट्रात मुक्कामी, संवाद बैठकीत मनोज जरांगे यांचे वक्तव्य

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील मराठा समाज एकत्र आला आहे. याची धास्ती देशाने घेतली आहे. मराठा समाजाच्या या एकीची अनेकांना धडकी भरली आहे. त्यामुळे भल्याभल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. याच कारणामुळे पंतप्रधान मोदी हे देखील सध्या महाराष्ट्रात गोधड्या घेऊन मुक्कामी आहेत, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते शुक्रवारी आष्टीच्या आंभोरा तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत बोलत होते.
राज्यात मराठा समाज एक झाला म्हणून लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात घ्यावी लागली. अन्य राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. हाच मराठा समजाचा विजय आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता. पण सरकारने आमच्या मायलेकीची डोकी फोडली. मी कोणालाही निवडून द्या, म्हटले नाही. मात्र, या निवडणुकीत असे पाडा की पुढच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजेत. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. तुम्हाला ही शेवटची संधी आहे, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मी कायदा आणि आचारसंहितेला मानतो. कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील, तेरे नाम, खेकड्याची औलाद. मी कधी तुझ्या नादी लागलो रे? फडणवीसांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले म्हणून सांगतो. लोकांचे कपडे घालणारा तू माझ्या नादी लागू नको. मराठ्यांच्या जीवावर चंद्रकांत पाटील निवडून येतात. तुला आमदारकीला दाखवतो, कसा निवडून येतो, ते बघतो?, अशा शब्दांत जरांगेंनी चंद्रकांतदादांना आव्हान दिले.