तृतीय पंथीयाचे बारावीत यश, सिग्नल वर पैसे मागून केला अभ्यास, भविष्यात पोलीस भरती होण्याचे स्वप्न

सोलापूर : प्रतिनिधी
समाज जीवनात वावरत असताना सर्वांना समान अधिकार आहे असे नेहमी म्हटले जाते, परंतु काही वेळा पुरुष स्त्री, उच्च नीच, गरीब श्रीमंत, धर्मभेद, जात-भेद यावरून वाद झालेले अनेक विषय नेहमी समोर आले आहेत. या सर्वांच्या पलीकडे आहे तो एक वेगळा प्रश्न ज्याकडे सर्व मानव जातीने प्रेमाने, आपुलकीने पाहिले पाहिजे. ते म्हणजे तृतीयपंथीय, नैसर्गिक दृष्ट्या त्यांच्यावर ओढवलेली आपत्ती पाहता त्यांना सहानुभूतीने पाहत, त्यांना समाजात उंच मानेने जगण्यासाठी मदत व्हावी अशीच अपेक्षा तृतीयपंथीयांची असते. अशा सर्व परिस्थितीतून यशाचे शिखर गाठत काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता उराशी बाळगत आज एका तृतीयपंथीयांनी यश गाठले, मग त्याचे कौतुक तर नक्की झाले पाहिजे.
सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या रवींद्र उर्फ प्रीती नागटिळक सिग्नल वर पैसे कमावणारे तृतीयपंथी मधील एक. बारावी मध्ये एक्कोन पन्नास टक्क्यांनी उत्तीर्ण होत पोलीस भरती होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत त्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
आयुष्यात खडतर प्रवास करत दहा वर्षांपूर्वी सुटलेला अभ्यास पुन्हा उरी बाळगून कुटुंब व मित्रांच्या पाठिंबामुळे पुन्हा पोलीस भरतीचे स्वप्न पाहणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे दिवसभर सिग्नल वर पैसे मागणे तर रात्रीच्या वेळी अभ्यास करत बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सद्य:स्थितीला स्वकष्टावर पोलीस भरतीचा सराव करत असून समाजाच्या पाठिंब्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र मार्फत सराव करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सिग्नल वर पैसे मागणारा हा तृतीयपंथी आज शैक्षणिक क्षेत्राकडे मोठ्या संख्येने वळत असून समाजाने याला स्वीकारले पाहिजे त्याचबरोबर तृतीयपंथांना समाजामध्ये ताठ मानेने जगण्याचा अधिकार आम्हालाही असून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलण्याची व समाजामध्ये स्थान निर्माण करण्याची संधीची गरज असल्याचे मत यावेळी तृतीयपंथीयांनी व्यक्त केली.